परंतु खिन्नपणे म्हणाले, 'आम्हाला स्वाभिमानच नाही! आम्ही माणसेच नाही जणू! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल!'
वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही.'
'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले.
'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या
होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे.' असे म्हणून श्यामने सुरूवात केली.
'मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो; परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले.
'आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते.