गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेविला; परंतु त्यावर माती ढकलवेना! लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये, म्हणून वरती सुंदरसा दगड ठेविला व आम्ही घरी आलो. माजघरात बाजूला बसलो व रडत होतो.
'का, रे बाजूला बसलास?' आईने विचारले.
'आई! मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे!' मी म्हटले.
आई हसली व म्हणाली, 'अरे वेडया, सुतक नको हो धरावयाला.'
मी म्हटले, 'आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो, ते?'
आई म्हणाली, 'माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्या जवळ असणार्याी मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे; म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत. म्हणून सुतक पाळीत असतात.
स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.
'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या