येतो. 'तुला कोठे येते रामरक्षा?' असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वत:चे काही सांगत नाही. खोटारडा कुठला.'
आई म्हणाली, 'मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुध्दा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?'
मी म्हणालो, 'भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ पुस्तक नाही.'
आई म्हणाली, 'भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर.'
भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची,
गावात माघी चतुर्थीचा गणपति-उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळयांतून अश्रू गळत होते. ज्या