'काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?' भीमाताईने विचारिले.
मी म्हटले, 'हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहीतच होतो.'
'वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही.' ती म्हणाली.
मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवडयात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे परंतु वेळ मिळताच वही हातांत घेत असे, मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता.
शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो, असे मला झाले होते. शेवटी
काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत?'
आई एकदम संतापून म्हणाली, 'तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी.'
माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, 'आम्हाला स्वाभिमानच नाही! आम्ही माणसेच नाही जणू! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल!'
वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत