प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठयांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरूषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे 'केसरी' संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुध्द बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील.
पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरूष खोल पाणी असले, तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांटया उडया मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगडया खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन, माना वर करून होडया करितात. नाना प्रकार करितात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे. परंतु मला मात्र पोहता येत नव्हते.