वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पध्दत आता खेडयातूनही नाहीशी होत चालली आहे.

गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. 'काय, श्याम! लईशी डोई वाडविलीस?' असे त्याने विचारले.

मी त्याला म्हटले, 'गोविंदा! तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात.' माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले.

आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळयातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते.

वडील आईला म्हणाले, 'हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात.


226 of 468

आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोचलो, तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?'

आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुऊन आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का, असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, 'श्याम! तू भित्रा आहेस असे


226 of 773