ही हळदीची पानेसुध्दा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोडया घाल. मी पण अंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो.'
वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो! मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो, असे आल्यावर त्यांनी पाहिले असते, तर त्यांची केवढी निराशा झाली असती! त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दु:ख झाले असते! हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत! दोन शब्दांनीच ती मरून जावीत, असे त्यांना वाटले असते.
का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम! तुझ्या आईला 'तुमची मुले भित्री आहेत', असे कोणी म्हटले, तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला, तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला, तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये, असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको. चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आज निजू नको, हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो.'