झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता.
'श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ.' वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.
आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला 'आई जाऊ?'
'कुठे रे बाबुल्या?' मी म्हटले.
'आईला आहे माहीत. जाऊ का?' त्याने विचारले.
आई म्हणाली, 'जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत नको बसू.' हसत सदानंद निघून गेला. धाकटया भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू.
परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत. फुकट मिळेल, तेवढे घ्यावे. अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुध्दा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुध्दा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्रयाचा व दास्याचा हा परिणाम आहे.
मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले, म्हणून खोडया करता