मी विचारले, 'आई ! करंदीकरांच्या झोपाळयावर का बसायला गेला?'
आई म्हणाली, 'नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठयाने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!' मला हसू आले.
बोलता बोलता आई म्हणाली, 'श्याम ! तू आज गेला असतास, तर त्यांना किती वाईट वाटले असते! त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, 'कोणी आठवण काढली? गजूने, की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे-तुमच्याकडे पाहूनच ते जगतात.
येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन-आणे घेऊन घरी आलो व मोठया हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते! भटजी बाराबारा वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करितात, तर त्यांना घेऊ दे. मला