कधी करू नये', असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?' माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.
गडयांनो! पतंजलीच्या भाष्यात, म्हणे असे एक वाक्य आहे, की 'एक: शब्द: सम्यक् ज्ञात: स्वर्गेलोके कामधुग्भवति । ' एकच शब्द; परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. 'सम्यक् ज्ञात:' नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, 'लाव, लाव हात!' ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॅक्रिटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो, तेच ज्ञान.
जेवले आहे की नाही, हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली, तर रागावत व म्हणत, 'मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी.' 'अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही.' वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. 'राजमान्य !' त्यांना कोणी विचारावे, 'भाजी कशी झाली आहे?' त्यांचे उत्तर ठरलेले असे. 'राजमान्य.' जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.