गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरूवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती.
श्यामने गोष्ट सांगण्यास सुरूवात केली.
आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्या वेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस्तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस्तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस किती तरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्याइतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंडू-फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ, वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे, असे ठरले होते.
सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात! 'करशील गडबड, का मारू आणखी!' वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. लहान आहे पाच-सहा वर्षांचा. तो मला म्हणतो, 'अण्णा, मला मास्तर व्हावयाचे आहे, नाही तर शिपाई व्हायचे आहे.' मी त्याला जर विचारले, 'हे दोन धंदेच तू का पसंत