आई केव्हा येते, याची मी वाट पाहात होतो. किती तरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती! बारा वर्षांत पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवापालट, ना कधी थारेपालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.

पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मी उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.

गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठया आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळयातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता.


338 of 468

केलेस?' तर तो म्हणतो, 'म्हणजे सर्वांना मारता येईल. सगळयांना झोडपून काढीन! मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो, असे म्हणाल; परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी! पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांवरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती- त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत. हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते, परंतु जाऊ दे.


338 of 773