होते. हे सुध्दा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? 'काशीस जावे नित्य वदावे । यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे'. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळ! आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे! पुरे हा संसार! कोठल्या यात्रा नि बित्रा! अरे, ही संसारयात्रा हीच मोठी यात्रा, हो! या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले.'
डोंगरावर धो धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळयांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.
व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनांचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसर्याो क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास, देऊ शकत नाही.