हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे-
गोकुळात खाशी तू दही दूध लोणी
परब्रह्म होतासि तू नेणे परि कोणी
एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी
पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी ।
ही गाणे म्हणत होती.
मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली,
'कोण?' आईने विचारले.
'मी श्याम.' असे उत्तर दिले.
'श्याम! आला रे माझा बाळ; आल्ये, हो!' असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरिले. 'देवांना नमस्कार कर. मी त्यांना गूळ ठेवत्ये. हो, आधी, बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते! त्याला देवाने नेले, म्हटले दुसरा दृष्टीस पडतो, की नाही?' असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो.
तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण.'
मित्रांनो! पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की, ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसर्यामकडे ते चार धंदे करतील; परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला, मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते.