'तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो.' असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते.
इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.
'या इंदूच्या आई, या.' म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. 'पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?' त्यांनी विचारले. 'हो पत्र आले आहे. इंदूने वाचले.' आई म्हणाली.
'तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते.' राधाताई म्हणाल्या.
'सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे?' आई म्हणाली.
थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.
जानकीबाई श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते.'
मित्रांनो! आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरूषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरूषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला. असे म्हणता