वयं यूयं' असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, 'अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया' देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दु:ख बोलतांही समजते. नामदेवाला माझे सुखदु:ख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो.
'नामदेव! मला घरी जावेसे वाटत आहे. आई फार आजारी आहे, असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे.' मी म्हटले.
'मग जा. भेटून ये.' तो म्हणाला.
'आईला डोळे भरून पाहून येईन! पण पैसे?' मी म्हटले.
'काल नाही का माझी मनीऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. दहा रूपये आहेत. तुला पुरतील? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा.' नामदेव म्हणाला.
'लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पहात बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाडयात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये.' असे आई म्हणाली.
आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, 'का ग, डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो.' असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.